खाली पहा, प्रसिद्ध महिला कीर्तनकार ‘शिवलीला ताई पाटील’ यांच्या कुटुंबाचे कधी न पाहिलेले फोटो…

ह भ प. म्हटलं की डोक्यात पगडी घातलेले , घा-या डोळ्यांचे, गो-या रंगाचे , साठी उलटलेले , धोतर नेसलेले बुवा डोळ्यासमोर यायचे. गेल्या वीसेक वर्षात हे चित्र पालटले.

कीर्तन म्हटलं की अभिजन या प्रतिमेला छेद गेला. त्याला कारणे देखील आहेत. परंपरागत व्यवसाय म्हणजे धार्मिक विधींचे पुरोहित, गुरूजी यासाठी अभिजन वर्गात मनुष्यबळ नाही. उच्चशिक्षण आणि परदेशी करीयर यामुळे उलट कुणी या व्यवसायात आलाच तर त्याला अर्थार्जनाची संधी आहे परदेशी.

वारकरी समुदायातून बहुजन समाजात कीर्तनकार घडवण्याची परंपरा गेल्या तीसेक वर्षात चांगली मूळ धरू लागली आहे. बरेचसे कीर्तनकार आता नावारूपाला आले आहेत. बाबामहाराज सातारकरांसारखे हभप होऊन गेले.

आंधळे महाराज असतील किंवा अजून कुणी असतील. हे सर्व महाराज गंभीर प्रकृतीचे होते. थोडेफार हास्याचे शिडकावे करत प्रेक्षकांशी संवाद साधण्याचे यांचे कौशल्य त्यांना लोकप्रियता मिळवून देतात.

मात्र इंदूरीकर महाराजांनी खळखळून हसवणारी कीर्तनं सुरू केली आणि बघता बघता आख्ख्या महाराष्ट्रात त्यांच्या कीर्तनाने धुमाकूळ घातला. आज युट्यूब असो, व्हॉट्स अ‍ॅप असो, फेसबुक असो की टिकटॉक असो.

इंदूरीकर महाराजांची कीर्तनं संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचतात. कीर्तनाच्या क्षेत्रात महाराजांनी क्रांतीच केली.

तरी देखील महिलांनी आजवर या क्षेत्रात म्हणावे असे नाव कमावले नव्हते. अभिजन वर्गातल्या तुरळक अशा महिला येत राहील्या. अपर्णाताई रामतीर्थकर यांच्या रूपाने पहिल्यांदा एखाद्या महीलेने इंदूरीकर महाराजांसारखी अमाप लोकप्रियता मिळवली. त्यांचे कीर्तनाचे किंवा प्रबोधनाचे विषय योग्य कि अयोग्य हा लेखाचा विषय नाही. महिला म्हणून त्या या क्षेत्रात उंचीवर गेल्या हे स्विकारायला पाहीजे. रूढ अर्थाने त्याला कीर्तन म्हणता येत नाही. पण उपदेश तसाच आहे. फक्त टाळकरी नसतील इतकाच काय तो फरक.

बहुजन समाजात मात्र महिला या क्षेत्रात येत नव्हत्या.
बालकीर्तनकार शिवलीला ताई पाटील यांच्या रूपाने महाराष्ट्राला पहिल्यांदा रूढ अर्थाने कीर्तनकार असलेली महिला मिळाली. अगदी शाळेत असल्यापासून त्या कीर्तन करतात. त्यांना कीर्तनासाठी वारकरी संघाकडून पुरस्कार मिळाले आहेत. ते ही लहान वयातच. तेव्हांपासूनच त्यांच्या कीर्तनाला खेड्यापाड्यात मागणी आहे.

आता त्यांना युवाकीर्तनकार असे संबोधण्यात येते.
शिवलीलाताई पाटील या इंदूरीकर महाराज यांच्याप्रमाणे खळखळून हसवतात. त्यांचा असा चाहता वर्ग आहे. एक महिला जेव्हां सांगते तेव्हां महिलांना ते पटते. त्या कीर्तन करताना प्रश्न विचारतात. त्या प्रश्नांची उत्तरं चिमटे काढत देतात. साधे साधे तत्वज्ञान सांगतात. खेड्यापाड्यात जे तत्त्वज्ञान प्रिय आहे तेच त्या सांगतात. त्यावर शिक्कामोर्तब करतात.

बाईच्या बाईपणाला मर्यादा घालणारे उपदेश त्यांच्या कीर्तनात असतात. त्याला गावकरी मंडळी माना डोलावतात. पुरोगाम्यांप्रमाणे त्या समजुतीला धक्का पोहोचवत नाहीत. स्त्री-स्वातंत्र्याची काही मतं कीर्तनात येतात पण दुपटीने बंधनं घालणारे उपदेश देखील येतात. बाईच्या डोक्यावर पदर का असला पाहीजे हे विनोदाच्या माध्यमातून त्या सांगतात.

कीर्तनकाराला अभिनय यावा लागतो हे त्यांच्याकडे पाहून पटते.
भर सभेत उभे राहून पुरूषांना अडचणीचे प्रश्न विचारत त्यांची टिंगल करणे हे महिलेसाठी सोपे काम नाही. गावाकडे राहीलेल्यांना त्याची कल्पना असेलच. पण ताई हे काम लीलया करतात. त्यांच्या नावातही लीला आहेच.

Leave a Comment