नागराज मंजुळे यांचे गावाकडचे घर कधी पाहिले आहे का?

‘झालं..झिंगझिंग…झिंगाट..झिंगझिंग..झिंगाट..!’ हे गाणं कानांवर पडंल की आपण सर्वजण थिरकायला लागतो. हे गाण पाहिलं किंवा ऐकल तरी आपल्या डोळ्यांसमोर ‘सैराट’ चित्रपट उभा राहतो. या सिनेमातील प्रमुख अभिनेता आकाश ठोसर आणि अभिनेत्री रिंकू राजगुरू यांच्या जोडीला अवघ्या महाराष्ट्राने डोक्यावर घेतले होते.

या जबरदस्त चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी संपूर्ण जगाला या सिनेमाद्वारे याड लावलं. ‘सैराट झालं जी’ अस म्हणत आर्ची आणि परश्याच्या जोडीने जगभरात धूमाकूळ घातला होता. सैराट चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत रेकॉर्डब्रेक कमाई केली होती.

‘फॅंड्री’ चित्रपटानंतर नागराज यांच्या ‘सैराट’ चित्रपटाने जोरदार मुसंडी मारत सर्वच पातळ्यांवर उंच झेप घेतली होती. या सिनेमाची जितकी चर्चा झाली, तितकीच चर्चा या दोघांच्या अभिनयाची,  नागराज यांच्या दिग्दर्शनाची,सिनेमातील गाण्यांची, संगीताची आणि इतर कलाकारांची ही झाली. 2016 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या सिनेमानंतर नागराज यांना ही अमाप लोकप्रियता मिळाली होती.

नागराज यांनी दिग्दर्शित केलेला हिंदीतील त्यांचा पहिलाच सिनेमा ‘झुंड’ या शुक्रवारी म्हणजेच 4 मार्चला सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे. झुंड या चित्रपटाची मागील कित्येक दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चा होत आहे. या सिनेमाच्या ट्रेलरला आणि गाण्यांना चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

या चित्रपटात बिग बी अमिताभ बच्चन यांनी प्रमुख भूमिकेत काम केले असून, त्यांच्यासोबत रिंकू राजगुरू, आकाश ठोसर यांच्या ही प्रमुख भूमिका आहेत. आता चाहत्यांचा या चित्रपटाला कसा प्रतिसाद मिळतोय ते शुक्रवारी समजेलच.

दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा आज इथपर्यंत पोहचण्याचा प्रवास हा नक्कीच सोपा नव्हता. यासाठी त्यांना बरीच वर्षे संघर्ष करावा लागला होता. आजच्या लेखामध्ये आपण दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या खडतर प्रवासाविषयी जाणून घेणार आहोत.

नागराज पोपटराव मंजुळे यांचा जन्म 24 ऑगस्ट 1977 मध्ये सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील जेऊर या गावी झाला होता. त्यांची घरची परिस्थिती ही बेताची होती. घरातील गरिबीमुळे नागराजचे वडील पोपटराव यांनी नागराज यांना त्यांचे भाऊ बाबुराव मंजुळे यांनी दत्तक घेतले होते. लहानपणापासून त्यांना अभ्यासामध्ये फार रस नव्हता. ते शाळेचे दप्तर एका ठिकाणी लपवून चित्रपट पहायला मित्रांसोबत जात असतं. सिनेमांचे वेड त्यांना लहानपणापासूनच होते.

नागराज यांच्या घरात कुणीच जास्त शिकलेलं नव्हतं. मात्र, तरी ही परिस्थितीशी झुंज देत त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण जेऊरमधून पूर्ण केलं होत. पुढील शिक्षणासाठी ते पुणे विद्यापीठात शिकायला आले. नंतर त्यांनी मराठी विषयात एम.ए. आणि पुढे एम.फिल पूर्ण केले. मात्र, चित्रपट निर्मितीचा ध्यास त्यांना शांत बसू देत नव्हता.

त्यासाठी त्यांनी नगरच्या महाविद्यालयात मास कम्युनिकेशन स्टडीजचा दोन वर्षांचा कोर्स पूर्ण केला. त्यानंतर, तिथेच प्रोजेक्टचा एक भाग म्हणून ‘पिस्तुल्या’ हा पहिला लघुपट त्यांनी निर्माण केला होता. या लघुपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता. इथूनच खरं त्यांच्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात झाली होती.

शालेय शिक्षणानंतर नागराज यांना काही मित्रांची वाईट संगत लागली होती. त्यातूनच ते व्यसनांच्या ही आहारी गेले होते. मात्र, नंतर हे सर्व सोडून ते पुन्हा शिक्षणाकडे वळले होते. त्याचवेळी त्यांना पुस्तके वाचण्याचा आणि कविता लेखनाचा छंद लागला होता. विविध लेखकांची पुस्तके वाचल्यामुळे त्यांच्या जीवनात फार मोठा बदल झाला.

शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांच्या मनात चित्रपट निर्मितीचा विचार येऊ लागला होता. मात्र, त्यांना पैशांची कमतरता होती. पैशांची कमतरता असल्यामुळे त्यांनी रात्री सुरक्षारक्षक म्हणून काम केले होते आणि दिवसभर ते लोकांचे कपडे इस्त्री देखील करून देत होते.

नागराज यांचे 1997 मध्ये सुनिता यांच्यासोबत लग्न झाले होते, तेव्हा ते केवळ 19 वर्षांचे होते आणि 12 वीत शिकत होते. लग्नाच्या सुमारे 15 वर्षानंतर त्यांनी 2012 मध्ये घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर 2014 मध्ये अखेर त्यांचा घटस्फोट झाला.

नागराज यांना 2010 मध्ये ‘पिस्तुल्या’ या लघु चित्रपटासाठी 58 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. त्यानंतर 2013 मध्ये ‘फँड्री’ चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार, इंदिरा गांधी सर्वोत्कृष्ट चित्रपट इत्यादी पुरस्कार मिळाले आहेत. 2016 मध्ये रिलीज झालेल्या त्यांच्या ‘सैराट’ चित्रपटाला 69 व्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

मंजुळे यांच्या मराठी कवितांवर आधारित ‘उन्हाच्या कटाविरुद्ध’ या पुस्तकाला 2011 मध्ये भैरूतन दामाणी साहित्य पुरस्कार, 2014 मध्ये नारायण सुर्वे काव्य प्रतिभा पुरस्कार जाहीर झाला होता. विशेष म्हणजे नागराज यांची ‘पिस्तुल्या’ ही शॉर्ट फिल्म येण्याआधी त्यांचा हा कविता संग्रह प्रकाशित झाला होता.  त्यांच्या या कवितासंग्रहातील कविता देखील प्रसिद्ध झाल्या होत्या.

Leave a Comment